जें अज्ञान येथें नसे । तरीच आत्मा असे ।
म्हणोनि बोलणीं वाइसें । नायकावीं कीं ॥ ७-३७ ॥
दोरीं सर्पाभास होये । तो तेणें दोरें बांधों ये ? ।
ना दवडणें न साहे । जयापरी ॥ ७-३८ ॥
नाना पुनिवेचे आंधारें । दिहा भेणें रात्रीं महुरें ।
कीं येतांचि सुधाकरें । गिळिजे जेवीं ॥ ७-३९ ॥
तियापरी उभयतां । अज्ञान शब्द गेला वृथा ।
हा तर्कावांचूनि हाता । स्वरूपें नये ॥ ७-४० ॥
****
मिठाची मासोळी
जीवित जाहली
जगण्या निघाली
पाणियात ॥७८
जळात मरण
बाहेर मरण
ठेवले वाढून
प्रारब्ध हे ॥७९
म्हणूनिया पाहे
अज्ञान ते नसे
आत्माच तो असे
सर्वथैव ॥८०
याहून वेगळी
टाकावी बोलणी
ऐकल्या वाचुनी
पूर्णपणे ॥८१
सर्पाभासे दिसे
पडलेली दोरी
सर्पा फास करी
कधी काय ॥८२
तीच दोरी साप
तीच दोरी दोरी
बांधण्याची खेळी
व्यर्थ सारी ॥८३
दिवसा भिऊन
अंधार पळाला
पुनवेसी आला
आश्रयाला ॥८४
येता न येताच
गिळाला चंद्राने
निरर्थ धावणे
झाले त्याचे ॥८५
तैसे हे अज्ञान
दोन्ही अंगे वृथा
शब्दची तत्वतः
फक्त असे ॥८६
स्वरूपाची सिद्धी
मुळी ना तयाला
तर्क ची राहिला
हाता मध्ये ॥८७
*****
********
भावानुवादक
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com