तैसें अज्ञान आपुली वेळ । भोगी हेचि टवाळ । आतां तरी केवळ । वस्तु होऊनि नसे ॥ ७-७१ ॥ देखा वांझ कैसी विये ? । विरूढती भाजली बियें ? । कीं सूर्य कोण्हा लाहे । अंधारातें ? ॥ ७-७२ ॥ तैसा चिन्मात्रे चोखडा । भलतैसा अज्ञानाचा झाडा । घेतला तरी पवाडा । येईल काई ? ॥ ७-७३ ॥ जे सायेचिये चाडे । डहुळिजे दुधाचें भांडें। ते दिसे कीं विघडे । तैसें हें पां ॥ ७-७४ ॥ नाना नीद धरावया हातीं । चेउनी उठिला झडती । ते लाभे कीं थिती । नासिली होय ॥ ७-७५ ॥
या परी सारे
अज्ञान असणे
आत्मत्वी वसने
व्यर्थ होय ॥१५८
वस्तूची केवळ
निखळ असते
अन्य ते नसते
काही तिथे ॥१५९
वंध्या नारीची ती
होय का प्रसूती
बीज विरुढती
भाजलेली ॥१६०
सूर्य काय कधी
भेटण्या तमाला
आहे काय गेला
सांगा बरे ॥१६१
चिन्मय चोखळ
आत्मा हा निखळ
अज्ञान विटाळ
तेथ नाही ॥१६२
आणि घेऊ जाता
शोध तो निक्षून
काही आल्यावीन
हात रिते ॥१६३
सायीच्या हव्यासे
ढवळले भांडे
काय ती सापडे
तिये माझी ॥१६४
घडे ती न घडे
तो ची ना विघडे
बोलणे हे घडे
तैसेची रे ॥१६५
निद्रा पकडणे
कुणी ठरवावे
आणिक उठावे
येताची ती ॥१६६
काय ती गावते
किंवा न गावते
सांगावे लागते
काय कुणा.॥१६७
+++++
भावानुवाद
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे