अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , ३१ते३५ (अभंग ६५ते ७७) **********
अहो अंधारपणाची पैज । सांडूनी अंधार तेज । जाला तैं सहज । सूर्यचि निभ्रांत । ७-३१ ॥
दुलांकूडपण सांडलें । आणि आगीपण मांडिलें । तैं तेंचि आगी जालें । इंधन कीं ॥ ७-३२ ॥
का गंगा पावत खेंवो । आनपणाचा ठावो । सांडी तैं गंगा हो । लाहे पाणी ॥ ७-३३ ॥
तैसें अज्ञान हें अज्ञान नोहे । तरी आत्मा असकें असों लाहे । येर्हवीं अज्ञान होये । लागलाचि ॥ ७-३४ ॥
आत्मेनसी विरोधी । म्हणोनि नुरेचि इये संबंधीं । वेगळी तरी सिद्धि । जायेचिना ॥ ७-३५॥
*******
टाकीला अंधार
काय त्या अंधार
म्हणावे का ॥६५
टाकता अंधार
होय तो भास्कर
निश्चित साकार
नाही काय ॥६६
दोन लाकडांनी
अग्नी पेटवून
अग्नीला धारण
केले जर॥६७
सरे पेटवण
आणि ते इंधन
आगची होऊन
सारे काही ॥६८
वहाळ ओहळ
वाहत जै आले
गंगेला मिळाले
कुठे जरी ॥६९
तयाचे ते पाणी
होय गंगा रूप
आपले स्वरूप
हरवून ॥७०
34
अज्ञान न राहे
अज्ञान ते मुळी
ज्ञानाच्या जवळी
येताचि रे ॥७१
सरते अज्ञान
प्रकाशते ज्ञान
सरते कारण
मीमांसाही ॥७२
यावरी जरी का
ऐसे म्हणे कुणी
ज्ञान पाजळून
आपले की ॥७३
होण्याच्या ही आधी
ज्ञान हे अज्ञान
अस्तित्व मान
असेचि ना ॥७४
तयालागि असे
सांगतो उत्तर
जे का प्रश्नावर
साकारते ॥७५
आत्मा व अज्ञान
विरोधी संपूर्ण
तया न म्हणून
संबंधही ॥७६
तसेच अज्ञान
वेगळे आपण
राहे कधीच न
ऐसे पहा ॥७७
********
भावानुवादक
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com