अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , ९६ते १००, (अभंग २०९ते२१९ )
96
अगा चंद्रापासून उजळ । जेणें राविली वस्तु धवळ । तयातें काजळ । म्हणिजतसे ॥ ७-९६ ॥
जर चंद्राहून
वस्तू ती उजळ
धुऊन सोज्वळ
केली कुणी ॥२०९
तरी तिजलागी
म्हणावे काजळ
याहून गोंधळ
काय असे ॥२१०
97
आगीचे काज पाणी । निफजा जरी आणी । अज्ञान इया वहणी । मानूं तरी तें ॥ ७-९७ ॥
आगीचे ते काम
जर असे पाणी
तर ही कहाणी
सत्य होय ॥२११
हि अज्ञानातून
दृश्य विस्तारली
साकार जाहल
स्वयंमेव ॥२१२
98
कळीं पूर्ण चंद्रमा । आणून मेळवी अमा । तरी ज्ञान हें अज्ञान नामा । पात्र होईजे ॥ ७-९८ ॥
पौर्णिमेचा चंद्र
अमावस्या आणी
तरही कहाणी
सत्य होय ॥२१३
ज्ञाना अज्ञानाची
साम्यता लाभून
घेई अभिधान
त्याचेच की ॥२१४
99
वोरसोनि लोभें । विष कां अमृतें दुभे । ना दुभे तरी लाभे । विषचि म्हणणें ॥ ७-९९ ॥
प्रेमे जर पान्हा
फुटला विषाला
वर्षे अमृताला
काय कधी ॥२१५
विषरुपी धेनु
दोहन करता
विषची तत्वता
मिळणार ॥२१६
100
तैसा जाणणेयाचा वेव्हारू । जेथें माखला समोरु । तेथें आणिजे पुरू । अज्ञानाचा ॥ ७-१०० ॥
ज्ञान व्यवहार
जिथे भरलेला
ठाव न उरला
अन्य कशा ॥२१७
तरी तेथे काय
अज्ञानाचा पूर
आला भरपूर
म्हणावे का ॥२१८
(दृष्य आणि दृष्टा
एकत्र मिळून
चिद्रुप भरून
जगी राही ॥२१९)
🌾🌾🌾
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
No comments:
Post a Comment