गंगावगाहना आली । पाणीयें गंगा झालीं । कां तिमिरें भेटलीं । सूर्या जैशीं ॥ १०-२६ ॥
ओहळ नद्यादी
गंगेशी भेटले
पाणीच जाहले
गंगेचे की ॥५७
किंवा अंधकार
जाता भेटायला
सूर्यची पै झाला
आपोआप ॥५८
नाहीं परिसाची कसवटी । तंववरीच वानियाच्या गोठी । मग पंधरावयाच्या पटीं । बैसावें कीं ॥ १०-२७ ॥
कस तो पहावा
तोवरी सोन्याचा
जव परिसाचा
स्पर्श नाही ॥५९
होताची तो स्पर्श
अवघे पंधरे
भेसळ न उरे
तया माझी ॥६०
तैसें जे या अखरा । भेटती गाभारां । ते वोघ जैसे सागरा । आंतु आले ॥ १०-२८ ॥
तयापरी इया
शिरूनी अक्षरा
भेटती गाभारा
अर्थाचिया ॥६१
जैसे का हे ओघ
मिळता सागरा
तया न दुसरा
आकार तो ॥६२
जैशा अकारादि अक्षरा । भेटती पन्नासही मात्रा । तैसें या चराचरा । दुसरें नाहीं ॥ १०-२९ ॥
अकार उकार
आणिक मकार
भेटता ओंकार
प्रकटतो ॥६३
पन्नासही मात्रा
भेटती ओंकारा
आणिक आधारा
वाव नाही ॥६४
सारे चराचर
भरुनी ओंकार
आणिक या पर
काही नाही ॥६५
तैसी तये ईश्वरीं । अंगुळी नव्हेचि दुसरी । किंबहुना सरोभरीं शिवेसीचि ॥ १०-३० ॥
तैसा ईश्वरास
अंगुली निर्देश
वाव करण्यास
मुळी नाही ॥६६
सारे त्रिभुवन
असे तो व्यापून
जाणा कणकण
शिवरूप॥६७
म्हणोनि ज्ञानदेवो म्हणे । अनुभवामृतें येणें । सणु भोगिजे सणें विश्वाचेनि ॥ १०-३१ ॥ ॥
ज्ञानदेव म्हणे
सार्या प्रेमभावे
अमृतानुभवे
आनंद हा ॥६८
अवघ्या विश्वाने
भोगावा आनंद
होऊन आनंद
रूपच ते ॥६९
इति श्रीसिद्धानुवाद अनुभवामृते ग्रंथपरिहारकथनं नाम दशमं प्रकरणं संपूर्णम् ॥
🌾🌾🌾 .
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵
No comments:
Post a Comment