अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २५१ते २५५ (अभंग ५३८ ते ५४६)
हा येणें पाहिला आइसा । कांहीं न पाहिला जैसा । आणि न पाहतांहि अपैसा । पाहणेंचि हा ॥ ७-२५१ ॥
द्वैताच्या अभावी
ययाचे पाहणे
असे न पाहणे
सांगितले ॥ ५३८ ॥
आणिक तरीही
घडते पाहणे
सहज पणाने
हेही खरे ॥५३९॥
येथें बोलणें न साहे । जाणणें न समाये । अनुभऊ न लाहे । अंग मिरौ ॥ ७-२५२ ॥
लाग न लागता
बोलणे खुंटते
जाणणे सरते
जाणण्याने ॥५४०॥
मग अनुभव
जगी ज्यास मान
जाई हरवून
त्याचा तो ही ॥ ५४१॥
म्हणोन ययातें येणें । ये परीचें पाहणें । पाहतां कांहीं कोणे । पाहिलें नाहीं ॥ ७-२५३ ॥
म्हणून जयाचे
स्वतःला पाहणे
नच की पाहणे
कुणी काही ॥५४२॥
किंबहुना ऐसें । आत्मेनि आत्मा प्रकाशे । न चेतुचि चेऊं बैसे । जयासि तो ॥ ७-२५४ ॥
किंबहुना हे
आत्माची प्रकाशे
आत्म्यालागी असे
जणू काही ॥ ५४३॥
आत्माच चैतन्या
करता न जागा
राहात असे जागा
सदा स्वये.॥५४४॥
स्वयें दर्शनाचिया सवा । अवघियाची जात फावां । परी निजात्मभावा । न मोडिताही ॥ ७-२५५ ॥
दर्शन रूपे जो
स्वतः विराजित
होई गा भ्रमित
द्रष्टा दृश्ये ॥ ५४५॥
निजात्म भाव तो
तयाचा तरी ही
मोडला कधीही
जात नाही ॥५४६॥
🌾🌾🌾
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
💮💮💮💮💮💮💮💮💮💮💮💮💮
No comments:
Post a Comment