अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , ६६ ते ७०, (अभंग १४८ते१५७ )
************
ऐसाहि आत्मा जेव्हां । जैं नातळे भावाभावा । अज्ञान असे तेव्हां । तरी तें ऐसें ॥ ७-६६ ॥
जैसें घटाचें नाहींपण । फुटोनि होय शतचूर्ण । कीं सर्वांपरी मरण । मालवलें कीं ॥ ७-६७ ॥
नाना निदे नीद आली । कीं मूर्छां मूर्छें गेली । कीं आंधारी पडली । अंधकूपीं ॥ ७-६८ ॥
काअभाव अवघडला । का केळीचा गाभा मोडला । चोखळा आसुडला । आकाशाचा ॥ ७-६९ ॥
कां निवटलिया सूदलें विख । मुकियाचें बांधलें मुख । नाना नुठितां लेख । पुसिलें जैसें ॥ ७-७० ॥
भावानुवाद :-
========
६६
असणे नसणे
याच्या निरपेक्ष
आत्मा जो प्रत्यक्ष
असे स्वयम् ॥१४८
तरी तया ठाई
अज्ञान आरोप
करता ते रूप
ऐसे दिसे ॥१४९॥
६७
नसलेला घट
जर का फुटला
शतचुर्ण झाला
कधी इथे ॥१५०
किंवा जर कधी
मरणा मरण
ठाकले येऊन
सामोरीच ॥१५१
६८
अथवा निद्रेला
जर निद्रा आली
मुर्छनेस आली
मुर्छा कधी ॥१५२
अंधार अंधारी
जर का अडला
आणिक पडला
अंधकुपी ॥१५३
६९
अभाव अडला
संकटी पडला
गाभाची मोडला
केळीयेचा ॥१५४
निर्मळ नितळ
आकाश पोकळ
तयात तो मळ
असेच ना॥१५५॥
७०
मेलेल्या च्या मुखी
विषची घातले
मुक्याचे बांधले
तोंड कुणी ॥१५६॥
जे नच अजून
लिहियेले कुणी
लेख ते पुसूनी
टाकीयले॥१५७॥
*****
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
No comments:
Post a Comment