अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २८६ते २९० (अभंग ६१६ ते६२५ )
💮💮💮💮
क्षीराब्धीं काळकूट । हे एकी परीचे विकट । परी काळकूटीं चोखट । सुधा कैंची ? ॥ ७-२८६ ॥
क्षीरसागरात
निघे काळकुट
विचित्र ही गोष्ट
जरी आहे ॥६१६
परी काळकुटी
येईल का अमृत
सदा जे चोखट
दैवी गुणे?॥६१७
ना ज्ञानी अज्ञान जालें । तें होतांचि अज्ञान गेलें । पुढती ज्ञान येकलें । अज्ञान नाहीं ॥ ७-२८७ ॥
अथवा अज्ञान
आले ज्ञानातून
येताच भरून
गेले ठायी॥६१८
आणिक शेवटी
अज्ञान सरले
ज्ञानची उरले
ऐसे होय॥६१९
म्हणौनि सूर्य सूर्याचि येवढा । चंद्र चंद्राचि सांगडा । ना दिपाचिया पडिपाडा । ऐसा दीपु ॥ ७-२८८ ॥
जैसी का उपमा
सूर्याला सूर्याची
चंद्राला चंद्राची
तशीच गा ॥६२०
दिव्याच्या योग्यते
दिव्याच्या वाचून
आणि ते कोण
असे इथे॥६२१
प्रकाश तो प्रकाश कीं । यासि न वचे घेईं चुकी । म्हणौनि जग असकी । वस्तुप्रभा ॥ ७-२८९ ॥
प्रकाशा सारखा
प्रकाशच जगी
चूक यात उगी
नाही काही ॥६२२
म्हणूनिया जग
नाव जे हे पाहे
वस्तू प्रभा आहे
जाणावे ती॥६२३
विभाति यस्य भासा । सर्वमिदं हा ऐसा । श्रुति काय वायसा । ढेंकरू देती ॥ ७-२९० ॥
भासते जग हे
जयाच्या प्रकाशे
श्रुती सांगतसे
आत्मतत्त्व ॥६२४
असा तिचा बोल
प्रकट पहावा
व्यर्थ तो म्हणावा
ढेकरू का?॥६२५
🌾🌾🌾
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
No comments:
Post a Comment