अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १६६ ते १७० (अभंग ३६१ते३६९)
🏵🏵🏵🏵
किळेचें पांघरुन । आपजवी रत्न कोण ? । कीं सोने ले सोनें पण । जोड जोडूं ? ॥ ७-१६६ ॥
रत्नावर कुणी
प्रभा आवरण
देतसे घालून
येउनिया ॥३६१
किंवा सोन्यावर
सोने पांघरून
जातसे निघून
काही कोण ॥३६२
तयाचे ते गुण
असती अभिन्न
तयात राहून
सर्वकाळी॥३६३
चंदन सौरभ वेढी ? । कीं सुधा आपणया वाढी ? । कीं गूळ चाखे गोडी ? । ऐसें आथी हें ? ॥ ७-१६७ ॥
चंदन पांघरे
काय सुगंधाला
अमृत स्वतःला
वाढतसे ॥३६४
गुळ चाखतसे
आपुलीच गोडी
काय अशा गोष्टी
आहे इथे ॥३६५
कीं उजाळाचे किळे । कापुरा पुटीं दिधलें ? । कीं ताऊन ऊन केलें । आगीतें काई ? ॥ ७-१६८ ॥
उजाळाचा लेप
कापुरा लाविला
तापवून केला
अग्नी उष्ण॥३६६
ना ना ते लता । आपुले वेली गुंडाळितां । घर करी न करितां । जयापरी ॥ ७-१६९ ॥
वेल वेलीलाच
जैसी का गुंडाळे
घर ते वेगळे
करीचि ना ॥३६७
कां प्रभेचा उभला । दीपप्रकाश संचला । तैसा चैतन्यें गिंवसला । चिद्रूप स्फुरे ॥ ७-१७० ॥
प्रभेने आपुल्या
दीप उजळतो
प्रकाश करतो
सर्वत्र गा ॥३६८
व्यापुनिया सारे
चैतन्य संपूर्ण
चिद्रुप स्फुरण
होत असे ॥३६९
🌾🌾🌾
🌺🌺🌺
No comments:
Post a Comment